वळणाचे पाणी वळणालाच जाते.., ही जुनी म्हण खोटी ठरत नाही....
२६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला समजले कि मुंबईत मिठी नावाची नदी आहे.
कोल्हापुरात शेकडो वर्षांपासून कोल्हापूरच्या मध्यातून एक छोटी नदी वाहत होती. हळू-हळू तिच्या दोन्ही तीरावर अतिक्रमण करून,घर-दुकान बांधून, लोकं एवढ्यावरच थांबली नाहीत, तर सगळ्या कोल्हापूरची गटार त्यामध्ये आणून सोडली आणि नदीचं नांव बदलंल "जयंती नाला" २०१९ आणि २०२१ मध्ये याच जयंती नाल्यान निम्मं कोल्हापूर चार दिवस पाण्यात बुडवलं होत. माणसांनी नदीचा नाला केला म्हणून नदी स्वतःच अस्तित्व विसरत नाही. तीच अवस्था चेन्नईची. चाळीस तलावांना जोडणारी एक छोटीसी नदी चेन्नईतून जाऊन पुढे समुद्राला मिळत होती. हपापलेल्या माणसांनी चाळीस तलाव मुजवून सिमेंटची जंगल उभा केली एवढयावरच थांबली नाहीत तर चेन्नईतील नदीचं गायब केली. एका दिवसाच्या पावसानं नदी आणि तलावांनी मिळून चेन्नई पाण्यात बुडवली. जोडीला विमानतळावरची विमान बदकासारखी पाण्यावर पोहायला सुद्धा लावली. हीच अवस्था पुण्याची झाली आहे. मुळा-मुठा नद्यांपेक्षा युरोप-अमेरिकेतील गटार मोठी असतील अशी अवस्था या नद्यांची पुणेकरांनी केली आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून पावसाळ्यात एकदा तरी पुणेकरांच्या घरी या नद्या राहायला येतात आणि चांगलेच भाडे देऊन जातात.
खरंतर नदी आपल्याकडं राहायला येत नाही आपणच नदीत जाऊन राहिलोय.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मी कुर्डुवाडीच्या पुढे जाताना एक बोर्ड पहिला "सीना नदी" बाजूला बघितले तर ऐन पावसाळ्यात कोरडाठाक पडलेला ओढाच वाटला तो. मनात विचार आला याला नदी का म्हणत असतील, उजाड माळरानागत दिसणारे पात्र याचा काय फायदा शेतीला? आज त्याच नदीन सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख एकर शेती पाण्यात बुडवली आहे.
हीच अवस्था धाराशिव आणि बीड,जालना, नगर जिल्ह्यातील छोट्या नद्यांनी सातशे गावातील लोंकाची केली आहे. जीव मुठीत घेऊन जगायला लावलंय त्यांना. बीड, जालना, नगर, सोलापूर ते सातारा-सांगली पट्ट्यात कोरड्या दुष्काळाचे आगार असणारे अनेक तालुके आज ओल्या दुष्काळाच्या पुढे निघून गेले आहेत.
एका व्हिडिओत पहिले एका आजीचे सगळे घर पुरात वाहून गेले. पुढे ती सांगत होती या घरात आम्ही दोघीच राहायचो मी आणि माझी मुलगी. माझा मुलगा आणि या मुलीचा नवरा दोघेपण मेलेत, मुलीला पोरंबाळं पण नाहीत. रोजंदारी करून जगतोय आम्ही.... आता कुठं राहायचं?
तर दुसऱ्या एका व्हिडिओत पहिले, नेहमी तोऱ्यात बोलणाऱ्या एका माजी मंत्र्यांच्या जहागिरीत नदी राहायला आली होती. त्यांच्या दरातील फॉर्च्युनर पाण्यावर तरंगत होत्या.
निसर्ग वेळ आली कि गरीब श्रीमंत काही बघत नाही. पण मला नेहमी वाटत निसर्गपण स्वार्थी असतो श्रीमंतावर अन्याय करतो पण गरिबांवर तो ज्यास्तच अन्याय करतो. दारात बसून रडणारी आज्जी आणि शेतकऱ्याच्या गोठयात दाव्यासहित मेलेली जनावर पहिली कि निसर्गाच्या स्वार्थीपणाची अजूनच खात्री होते.
पण असो... येणारा काळ अजूनच अवघड असणार आहे. गावोगावची हीच अवस्था आज नहितर उद्या होणार आहे.
मागे एकदा कुठेतरी वाचले होते कोकणकड्यातील डोंगरातून वाहत येणाऱ्या नदीचा मार्ग बदलून त्यावरती एक मोठं विमानतळ राज्यात होतंय. भविष्यात ती नदी आपली वाट काढत आली तर? शंभर वर्षानंतर या पावसाळ्यात अशीच एक नदी सोलापूरमध्ये आपली वाट काढत अवतरली आहे. नदीच्या काठाला पिढ्यान पिढ्या गेलेल्या सोलापूरकरांना आता समजलं आपण नदीत राहत होतो. ९९.९९% सोलापूरकरांना या नदीचं नावसुद्धा माहित नाही.
नदी मांजरीसारखी असते आपली वाट कधी विसरत नसते.
निसर्गाला एवढपण कमी लेखून आपली लोभी साम्राज्यं उभा करता येत नाहीत आणि केलीच तर तो स्वतःच अस्तिव दाखवूनच देतो.
"जंगलात उभं राहिलेल्या मुंग्यांच्या एक वारुळ पण हत्तींना जंगल सोडावं लागत"

Post a Comment
0 Comments